यात्रा, उत्सव, प्रवासी गर्दीचा हंगाम कालावधीत जादा प्रवासी वाहतूक व सामाजिक बांधिलकी
महामंडळाकडून करण्यांत येणारी प्रवासी वाहतूक ही प्रामुख्याने सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून करण्यांत येते. या अंतर्गत राज्यातील अतिदुर्गम, आदिवासी भागात पुरेशा संख्येने प्रवासी उपलब्ध नसतानाही अशा भागाकरिता किमान प्रवासी वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी या हेतूने महामंडळाकडून प्रसंगी आर्थिक तोटा सहन करुन प्रवासी वाहतूक करण्यांत येते. अशा वाहतूकीमुळे राज्यातील दुर्गम भागाचा संप इतर भागाशी होऊन अशा दुर्गम भागाचा विकास होण्यास मदत होत आहे.
विद्यार्थी, विद्यार्थिनी या सामाजिक घटकांना उपलब्ध असलेल्या शैक्षणिक सुविधेचा लाभ सहजरित्या घेता यावा याकरिता आवश्यक ती वाहतूक सुविधा पुरविण्याची कामगिरी महामंडळाकडून पार पाडण्यांत येत आहे. या अंतर्गत राज्यातील बहुतांश मार्गांवर शालेय विद्यार्थ्यांकरिता विशेष फे-या चालनात आणलेल्या आहेत. याशिवाय विद्यार्थी, विद्यार्थिनी यांना प्रवासभाडे दरात विशेष सवलत देण्यांत येत असल्याने विद्यार्थी, विद्यार्थिनी यांचेवर वाहतूक खर्चाचा फारसा आर्थिक ताण पडत नाही आणि महामंडळाच्या या धोरणामुळे शासनाचे 100% साक्षरता अभियान पार पाडण्याच्या धोरणास महामंडळाने पूरक वातावरण निर्माण केलेले आहे. त्याचप्रमाणे, राज्यातील सर्वांगिण विकासास सदर धोरण पूर्वीपासून हातभार लावत आहे.
राज्यातील विविध यात्रा, उत्सव, सण, इत्यादि प्रसंगी नागरिकांची कोणत्याही प्रकारे प्रवासी वाहतूक सेवेअभावी गैरसोय होऊ नये याकरिता महामंडळाकडून प्रसंगी आर्थिक तोटा सहन करुन प्रवासी वाहतूक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते. विशेषत: यात्रा,उत्सव, इत्यादी प्रसंगी पूर्वी केलेल्या वाहतुकीचा संपूर्ण तपशील महामंडळाकडे उपलब्ध असतो, त्याअनुषंगाने जादा वाहतुकीचे नियोजन महामंडळाकडून करण्यात येते. यात्रा,जादा प्रवासी वाहतुकीदरम्यान प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये व प्रवास सुलभ व्हावा याकरिता महामंडळाकडून यात्रास्थळी विशेष प्रवासी निवारा / बसस्थानक निर्माण करुन त्याद्वारे इतर अनुषंगिक प्रवासी सुविधासुध्दा उपलब्ध करुन देण्यांत येतात. आषाढी, कार्तिकी पंढरपूर यात्रा, गौरी-गणपती सण, आळंदी यात्रा, दिवाळी इत्यादी प्रसंगी व स्थानिक यात्रा याकरिता महामंडळाकडून जादा प्रवासी वाहतूक करण्यात येते.
|